भीमसृष्टी’ वाघदर्डीऐवजी मनमाड शहरातच उभारा; आरपीआय (आठवले गट) युवक कामगार आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मनमाड(प्रतिनिधी):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंजूर झालेली ‘भीमसृष्टी’ चांदवड तालुक्यातील वाघदर्डी येथे न उभारता, ती मनमाड शहरातच उभारण्यात यावी, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वंदेश गांगुर्डे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भातील मागणीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले आहे.मनमाड शहरासाठी उभारण्यात येणारी ‘भीमसृष्टी’ चक्क चांदवड तालुक्यात गावकुसाबाहेर बनवुन तुम्ही आजही आम्हाला गावाबाहेर ठेवता का..? असा सवालही गांगुर्डे यांनी उपस्थित केला आहे.
दिलेल्या निवेदनात गांगुर्डे यांनी म्हटले आहेकी शासनाने मनमाड शहरात ‘भीमसृष्टी’ उभारण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, ही भीमसृष्टी शहरापासून दूर असलेल्या वाघदर्डी (ता. चांदवड) येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात येत असून तो अत्यंत अयोग्य आहे, वाघदर्डी हे ठिकाण शहरापासून दूर असल्याने तेथे नागरिकांची वर्दळ कमी राहील. तसेच या परिसरात धरण असल्यामुळे भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीनेही काही गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.मनमाड शहराचा ऐतिहासिक वारसा असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पाऊलखुणा मनमाड शहराला लाभल्या आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारी १९३८ रोजी डॉ. बाबासाहेबांच्या उपस्थितीत मनमाड येथे ऐतिहासिक कामगार परिषद पार पडली होती. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहदेखील असून, या निमित्ताने विश्वभूषण डॉ. बाबासाहेबांनी मनमाड शहराला अनेकदा भेटी दिल्या होत्या. मनमाड शहर हे आंबेडकरवादी चळवळीचे एक मुख्य केंद्र आणि बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. त्यामुळे ‘भीमसृष्टी’ मनमाड शहरातच होणे ऐतिहासिकदृष्ट्या न्याय्य ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे.मनमाड शहरामध्ये या प्रकल्पासाठी अनेक योग्य आणि प्रशस्त जागा उपलब्ध आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात भीमसृष्टी उभारल्यास समाजातील सर्व नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटकांना त्याचा सहज लाभ घेता येईल. यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड चौकातील जुन्या बीपीसीएल (BPCL) कंपनीची जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी आरपीआयने केली आहे. ही जागा शहराच्या अगदी मध्यभागी असून वाहतूक, संपर्क आणि इतर सर्व सोयींच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन, योग्य ती प्रशासकीय कारवाई व्हावी यासाठी या पत्राची प्रत राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री मा. ना. रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. संजय शिरसाट यांनाही माहितीसाठी रवाना करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वंदेश गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.निवेदनावर तौसीफ खान(अ.सं.जिल्हा कार्याध्यक्ष)चंद्रमणी उबाळे(जिल्हा युवक उपाध्यक्ष)विशाल छाजेड(युवा नेता)राजाभाऊ सावदेकर(कामगार आघाडी शहर अध्यक्ष)संजय मुनोत(व्यापारी नांदगाव ता. अध्यक्ष)अमित गुंदेचा(व्यापारी मनमाड शहर अध्यक्ष)नाझर अली शेख(युवा नेते)सनी वानखेडे(युवा नेते)सुरज आहेर(युवा नेते)दिलीप जाधव(युवा नेते)मिलींद जाधव(युवा नेते)अजिंक्य डमरे(युवा नेते)अनिल चौधरी तालुका अध्यक्ष कामगार आघाडी आदींच्या सह्या आहेत.

आम्ही पूर्वीही गावाकुसाबाहेर होतो आताही गावकुसाबाहेरच का..?डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण आयुष्य हे जातीव्यवस्था मोडुन काढण्यासाठी वेचले आमच्या पूर्वजांना तेंव्हावी गावकुसाबाहेर ठेवण्यात येत होतं आणि आता सध्याच्या सत्ताधारी व प्रशासनाने देखील तेच केले आहे शहरातील अनेक ठिकाणी मोक्याच्या जागा असताना विशेष म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक मोक्याच्या जागेचा नियमबाह्य ठराव करण्यात आला आहे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी गावाबाहेर जागा देने योग्य नाही याचा आम्ही जळजळीत निषेध करतो..वंदेश गांगुर्डे, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र कामगार आघाडी रिपाई

























