नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र
नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा (स्टॉपेज) आणि प्रवाशांच्या इतर सोयी-सुविधांशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक दखल घेतली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी खासदार भास्कर मुरलीधर भगरे यांना दिले आहे.गेल्या दोन वर्षांपासून खासदार भगरे हे मनमाड गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू व्हावी व कोरोना काळात नांदगाव स्थानकावर बंद केलेल्या गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी पत्रव्यवहार करत आहेत
खासदार भास्कर भगरे यांनी २२ मार्च २०२६ रोजी नांदगाव रेल्वे स्थानकावरील समस्यांविषयी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवले होते. २२ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या पत्राद्वारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदारांच्या पत्राची दखल घेतल्याचे स्पष्ट केले. खासदार भगरे यांनी उपस्थित केलेल्या विषयांची सखोल तपासणी/चौकशी केली जात असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती सकारात्मक कारवाई केली जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.नांदगाव हे परिसरातील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने येथे अनेक द्रुतगती (Express) गाड्यांना थांबा मिळावा, अशी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रोजच्या प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. खासदार भास्कर भगरे यांनी या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधल्यानंतर आता स्वतः रेल्वेमंत्र्यांनी यावर कारवाईचे संकेत दिल्याने, लवकरच नांदगाव रेल्वे स्थानकावर नवीन गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निर्णयामुळे नांदगाव आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
मनमाडची गोदावरी एक्सप्रेस पुन्हा धावणार…?
मनमाड शहरातील नागरिकांसह जिल्ह्यातील चाकरमाण्याची जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी एक्सप्रेस धुळेकरांनी पळवून नेली याविषयी अनेक आंदोलन झाले अनेक वेळा शिष्टमंडळाने भेटी घेतल्या यात खासदार भास्कर भगरे यांनीही निवडून आल्यापासूनच या विषयावर अनेकदा पत्रव्यवहार केले आहेत याशिवाय रेल्वे मंत्र्यांच्या भेटी घेऊन गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असुन लवकरच मनमाडकराची हक्काची गोदावरी एक्सप्रेस पुन्हा धावणार असे चित्र दिसत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख































