“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार” “युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज गुंजाळ
मनमाड(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विकसित भारत की पहचान, नशा मुक्त भारत अभियान हा उपक्रम महाराष्ट्र शासन, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण, मनमाड नगर परिषद व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांतर्फे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आला. या विकसित भारतासाठी नशामुक्त युवक अभियानात मनमाड शहरातील छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, इंडियन हायस्कूल, एच ए के हायस्कूल, के आर टी स्कूल, गुड शेफर्ड स्कूल, व स्वामी विवेकानंद विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तची सामूहिक शपथ महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक आय.पी.एस सुरज गुंजाळ, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन, नगराध्यक्ष योगेश पाटील, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे, मनमाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शेषराव चौधरी व प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांच्या समवेत घेतली. मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम रोखणे, व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे तसेच समाजात जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी युवकांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास व सकारात्मक उपक्रमांकडे वळावे, असे आवाहन केले. पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी व्यसन हे केवळ व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंब व समाजाचे नुकसान करणारे संकट असून, व्यसनमुक्तीसाठी युवकांनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन केले. नगराध्यक्ष बबलू पाटील यांनी मनमाड शहराला व्यसनमुक्त व निरोगी शहर बनविण्यासाठी शाळा, महाविद्यालय, पालक, प्रशासन व नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी अमली पदार्थांच्या सेवनाचे कायदेशीर व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करून युवकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था व नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले,तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी महाविद्यालयीन युवक हे राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ असून, त्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश स्वतःपुरता मर्यादित न ठेवता कुटुंब व समाजापर्यंत पोहोचवावा, असे प्रतिपादन केले. यावेळी मनमाड शहरातील विविध शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. या उपक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, कुलसचिव श्री समाधान केदारे,शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. डी व्ही सोनवणे, डॉ संजय चिंचोले, प्रा. समाधान सुखदेवे, प्रा. विठ्ठल फंड, कार्यालयीन अधीक्षक श्री एल के निकम व मनमाड शहरातील पत्रकार बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विठ्ठल सातपुते यांनी केले. या कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, लेफ्टनंट प्रकाश बर्डे, डॉ.आरती छाजेड यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























