दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मनमाड वकील संघाकडून तीव्र निषेध; तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
मनमाड ( प्रतिनिधी):- दिल्ली येथील जंतरमंतर येथे NEET (नीट) पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शांततामय मार्गाने उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष व क्रूर लाठीचार्जच्या निषेधार्थ ‘मनमाड सिटी बार असोसिएशन’च्या (वकील संघ) वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ वकील संघाने नाशिकचे जिल्हाधिकारी व नांदगावचे तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरातील हजारो विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे लोकशाही आणि सनदशीर मार्गाने आंदोलन व उपोषण करत होते. परंतु, दिल्ली पोलिसांनी कसलाही विचार न करता आंदोलक विद्यार्थ्यांवर अत्यंत क्रूर व अमानुषपणे लाठीमार करून हिंसाचार केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. असे असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई बेकायदेशीर, निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.मनमाड सिटी बार असोसिएशनने विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, विद्यार्थ्यांवर बेकायदेशीरपणे हल्ला करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शासनाकडे केली आहे.या निवेदनावर मनमाड सिटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. किशोर सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश पाटील, सचिव ॲड. शशिकांत व्यवहारे, ॲड. सुधाकर मोरे, ॲड. खुशालराव कुंभारे, ॲड. मुनव्वर मन्सूरखान पठाण, ॲड. उल्लास वासुदेव गावंडे, ॲड. कविता सुभाष आव्हाड, ॲड. मोहसीन शिकलगार, ॲड. राजश्री भडके, ॲड. आर. एम. पांडे, ॲड. टी. जी. कादरी, ॲड. शिवम कुलठे, ॲड. आर. बी. शिंदे यांच्यासह वकील संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या सह्या आहेत.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























