शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी समाधान शिबिर उपक्रम अतिशय महत्वाचा – डॉ.शेफाली भुजबळ
*येवला,दि.१७ एप्रिल :-* महाराष्ट्र शासनाच्या वतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासन आपल्या दारी या भूमिकेतून राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज माऊली लॉन्स येवला येथे पार पडले. यावेळी आयोजित उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, अपर तहसीलदार शीतल घोलप, नायब तहसीलदार पंकज नेवसे, नायब तहसीलदार विवेक चांदवडकर, उपअभियंता पुष्पा पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, शासन आपल्या दारी या भूमिकेतून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दाखल्यांचे वितरण करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी समाधान शिबिर हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. महाराजस्व समाधान शिबिर हे केवळ एक शासकीय उपक्रम नसून नागरिकांच्या विश्वासाला बळकटी देणारे माध्यम आहे. प्रशासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे. सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचा प्रयत्न या अभियानातून दिसून येतो. या समाधान शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ७/१२ व ८अ उताऱ्यांचे वितरण, फेरफार नोंदींचा निपटारा, जमीन मोजणी, वारसा नोंद, तसेच विविध योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.





























