वंचित बहुजन आघाडी आक्रमक; घरमालकांच्या परवानगीशिवाय वीज तारा टाकल्याने उपविभागीय अभियंत्यांना निवेदन
मनमाड (प्रतिनिधी): भारतीय विद्युत कायदा २००३ आणि भारतीय तारायंत्र कायदा १८८५ मधील कलमांचा गैरवापर करत, मनमाड येथील ‘महावितरण’ (MSEDCL) कंपनीने खाजगी घरमालक व भोगवटादारांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या घरांवरून वीज वाहक तारा टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला असून, या तारा तात्काळ हटवण्यात याव्यात यासाठी उपविभागीय विद्युत अभियंता, मनमाड यांना एक जाहीर इशारा (निवेदन) दिले आहे.
मनमाड शहरातील विविध भागांत वीज कंपनीकडून नवीन विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम सुरू आहे. भारतीय विद्युत कायदा, २००३ चे कलम ६७ आणि भारतीय तारायंत्र कायदा, १८८५ चे कलम १० या कायदेशीर तरतुदींचा आधार घेत वीज कंपनीने नागरिकांच्या खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. कायदा केवळ सार्वजनिक हितासाठी अपवादात्मक परिस्थितीत अधिकार देतो, परंतु महावितरणने स्थानिक नागरिकांना, घरमालकांना विश्वासात न घेता किंवा त्यांची कोणतीही संमती न घेता थेट छतावरून आणि घराच्या अगदी जवळून हायव्होल्टेज तारा ओढल्या आहेत.
घरावरून गेलेल्या या विद्युत तारांमुळे भविष्यात मोठी जीवितहानी किंवा गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वंचित बहुजन आघाडीचा महावितरणला आंदोलनाचा इशारा देत श्रावस्ती नगरच्या नागरिकांच्या या समस्येची दखल घेत मनमाड उपविभागाचे विद्युत अभियंता यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, “सार्वजनिक कामाच्या नावाखाली नागरिकांच्या खाजगी हक्कांवर गदा आणली जात आहे. घरमालकांना अंधारात ठेवून टाकण्यात आलेल्या या वीज तारा तात्काळ हटवण्यात याव्यात. जर महावितरणने यावर तातडीने कारवाई केली नाही आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे. जिल्हा सचिव कादीर शेख. जेष्ठ नेते दिपक साळवे बाबा. अमोल केदारे. सुनील बागुल.काकासाहेब भालेराव.प्रशांत गांगुर्डे, राकेश पगारे, रुपेश जाधव. जॉय साळवे. शहर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, काकासाहेब भालेराव. उपाली बनसोडे.भाग्यश्री मालाकार.महादेव भोजने.योगेश लव्हाटे.जगन कांबळे.निलेश इंगळे.विजय संसारे समाधान सुपारे स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.महावितरण यावर आता काय पाऊल उचलते आणि नागरिकांना या त्रासातून कधी मुक्त करते, या
कडे संपूर्ण मनमाड शहराचे लक्ष लागले आहे.





























