अनकवाडे-सटाणे एमआयडीसीची विनानोटीस मोजणी शेतकऱ्यांनी उधळली न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अधिकारी बांधावर; थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा

मनमाड ( प्रतिनिधी):- मनमाड जवळील मौजे अनकवाडे आणि मौजे सटाणे परिसरात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला आहे. हे संपूर्ण प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी या संदर्भातील नोंदी रद्द करण्याचे आदेश दिलेले असतानाही, आज भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणीचे काम पूर्णपणे उधळून लावले आणि अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून हुसकावून लावले. या प्रकारामुळे मनमाड परिसरात प्रशासना विरोधात शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप पाहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड नांदगाव तालुक्यातील अनकवाडे आणि सटाणे परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू आहेत. मात्र, आपली वर्षानुवर्षांची सुपीक आणि कसदार शेती उद्योगांच्या घशात घालण्यास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. परिसरात जवळपास ४०० एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. असे असतानाही ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या चांगल्या दर्जाच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज भूमी अभिलेखचे अधिकारी अचानक गावात दाखल झाल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून रोखले. “आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण आम्ही आमच्या हक्काच्या जमिनी देणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. संपूर्ण सरकारी यंत्रणा सध्या राजकीय दबावाखाली काम करत असून, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. तसेच “महाराष्ट्रात सध्या मोठ्या कंपन्या येण्यास तयार नसताना, मनमाडसारख्या भागात कंपन्या कशा येतील?” असा रोकडा सवालही शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
थेट मुंबईत आत्मदहनाचा इशारा
प्रशासनाच्या या दडपशाही आणि मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत. सरकारने हा अन्यायकारक भूसंपादनाचा घाट त्वरित न थांबवल्यास, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर आपल्या संपूर्ण परिवारासह आत्मदहन करू, असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकारानंतर अनकवाडे आणि सटाणे परिसरातील वातावरण कमालीचे तापले असून, प्रशासन आता यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणा राजकीय दबावाखाली..?
नांदगाव तालुक्यातील महसूल विभाग,तहसील कार्यालय, नगर पालिका,पंचायत समिती,पोलिस स्टेशन यासह इतर सर्वच शासकिय यंत्रणा या राजकीय दबावाखाली काम करत असुन अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करणे अनेकांना त्यांच्या व्यवसायाबद्दल नोटीस बजावणे,किंवा शासकीय पातळीवर काम अडवून ठेवणे विशेष म्हणजे अधिकारी स्वतः आम्ही मजबूर आहोत आमच्यावर वरिष्ठांचे दबाव आहेत किंवा राजकीय दबावामुळे आम्ही काम करत नाही असे सांगत आहेत याला गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री न्याय देतील का..? असा सवाल देखील तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























