श्रेयाचे राजकारण की जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिक लढा…? वंचीत बहुजन आघाडीचा श्रेय लाटणाऱ्या राजकीय पक्षांना टोला…!

मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड शहरात स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने १५ जून २०२६ रोजी महावितरणला लेखी निवेदन देऊन सर्वप्रथम नागरिकांच्या वतीने आवाज उठवला होता. महावितरणकडून ग्राहकांना ४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्याचे संदेश पाठवले जात असताना, ही ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी सक्ती असल्याचे स्पष्टपणे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यानंतर या विषयाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. वृत्तपत्रांमधूनही या भूमिकेची नोंद झाली. त्यानंतर महावितरणने स्पष्टीकरण देत घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे जाहीर केले.
मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाचे श्रेय काही राजकीय पक्ष घेत असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या प्रश्नावर उशिरा भूमिका घेऊन, आधीपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे आणि निवेदनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या मूल्यांना साजेसा नाही.लोकशाहीत जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येणे निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु ज्यांनी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केला, प्रशासनाला निवेदन दिले आणि नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला, त्यांच्या योगदानाची प्रामाणिक दखल घेणे तितकेच आवश्यक आहे.
वंचित बहुजन आघाडीचा उद्देश कधीही श्रेय मिळवणे नसून जनतेचे हक्क आणि हित जपणे हा आहे. मात्र, वस्तुस्थिती आणि संघर्षाचा इतिहास झाकून राजकीय लाभासाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न जनतेच्या लक्षात येत असतो.सत्य हेच आहे की, स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात मनमाडमध्ये १५ जून २०२६ रोजी महावितरणला सर्वप्रथम निवेदन देऊन या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आणि प्रामाणिकपणे संघर्ष करणाऱ्यांचे योगदान नाकारून केवळ श्रेयाचे राजकारण करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे.जनतेला सत्य माहिती असणे आणि संघर्षाचा खरा इतिहास समोर येणे, हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी केले.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























