शेतकऱ्यांचा रोष! अनकवाडे-सटाणे एमआयडीसीची विनानोटीस मोजणी शेतकऱ्यांनी उधळली; सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
मनमाड(प्रतिनिधी) :मनमाड येथील प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही, आज भूमिअभिलेख विभागाच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले आणि त्यांना घटनास्थळावरून हुसकावून लावले. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून करण्यात येणारी ही कारवाई पुन्हा एकदा शासकीय सुट्टीच्या दिवशी आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या हेतूवर सवाल उपस्थित केले आहेत.मौजे अनकवाडे आणि मौजे सटाणे परिसरात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, आपली सुपीक शेती उद्योगांच्या घशात घालण्यास शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. आज कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस किंवा पूर्वकल्पना न देता भूमिअभिलेखचे अधिकारी मोजणीसाठी गावात दाखल झाले. याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांनी मोजणीच्या कामात अडथळा निर्माण केला.

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनाचे ‘टायमिंग’. शेतकऱ्यांच्या मते, आजपर्यंत एमआयडीसी संदर्भात जी काही महत्त्वाची कारवाई किंवा पाहणी करण्यात आली, ती नेहमी शासकीय सुट्टीच्या दिवशीच का केली जाते? “प्रशासन जाणीवपूर्वक सुट्टीचा दिवस निवडते जेणेकरून आम्हाला वरिष्ठ कार्यालयात दाद मागता येणार नाही किंवा न्यायालयीन प्रक्रिया करता येणार नाही,” असा गंभीर आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.मोजणीसाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. “आमच्या जमिनी आमचा जीव आहेत, त्या कोणत्याही परिस्थितीत देणार नाही,” अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून रोखले. वाढता तणाव पाहून अखेर मोजणी पथकाला आपले साहित्य गुंडाळून माघारी फिरावे लागले. यावेळी बोलताना शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, “प्रशासन लोकशाही मार्गाने आलेल्या हरकतींकडे दुर्लक्ष करत आहे. नोटीस न देता मोजणीला येणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. जर यापुढे असाच छुप्या पद्धतीने प्रयत्न झाला, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रक्त सांडले तरी आमच्या जमिनी देणार नाही..!
जवळपास 400 एकर शासकीय जमीन उपलब्ध असतांनाही शेतकऱ्यांच्या सुपीक आणि चांगल्या दर्जाची जमीन विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मुळात राजकीय दबावाखाली अधिकारी काम करत असुन आमच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावात खरेदी करण्याचा हा घाट आहे आम्ही तो पुर्ण होऊ देणार नाही महाराष्ट्रात कंपन्या येण्यास तयार नाही मग मनमाड सारख्या शहरात कशा येतील हा आमचा प्रश्न आहे आमचे रक्त सांडले तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही
अनिल चव्हाण शेतकरी

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































