मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदेंना मोठा धक्का; शिंदे गटाचे संचालक फुटले, संजय पवारांचा सभापती पदाचा राजीनामा!

मनमाड(प्रतिनिधी) : – मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असून आमदार सुहास कांदे यांना जोरदार चपराक बसली आहे. बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय सयाजी पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, यामुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दीपक गोगड आणि गणेश धात्रक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ६ संचालक फोडून सत्ता पुन्हा आपल्याकडे खेचून आणली आहे.या राजकीय उलथापालथीमुळे नांदगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीत सुरुवातीला समीर भुजबळ, गणेश धात्रक आणि दीपक गोगड यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आली होती. मात्र, काही काळानंतर नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांनी राजकीय खेळी करत दीपक गोगड यांचे संचालक पद रद्द केले. तसेच भुजबळ गटाचे काही संचालक फोडून माजी आमदार संजय पवार यांना सभापती पदावर बसवले होते. गेल्या काही दिवसांपासून आमदार सुहास कांदे आणि सभापती संजय पवार यांच्यात अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते. या बिघडलेल्या संबंधांचा फायदा घेत दीपक गोगड आणि गणेश धात्रक यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी शिंदे गटाचे तब्बल ७ संचालक आपल्या बाजूने फोडले आणि बाजार समितीमधील बहुमताचे गणित पूर्णपणे बदलून टाकले. बहुमत गमावल्याचे स्पष्ट होताच आणि आमदारांसोबतच्या वादामुळे सभापती संजय पवार यांनी अखेर १० जुलै २०२६ रोजी आपल्या सभापती पदाचा अधिकृत राजीनामा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडे सोपवला आहे. २१ नोव्हेंबर २०२५ पासून ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले असले, तरी यामागे मोठे राजकीय नाट्य असल्याचे स्पष्ट दिसत आहे.या संपूर्ण घडामोडींमुळे आमदार सुहास कांदे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठी चपराक बसली असून, मनमाड बाजार समितीवर आता पुन्हा एकदा भुजबळ, गोगड आणि धात्रक गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
शिंदे गटाला नाशिक जिल्ह्यात गळती…?शिवसेना शिंदे गटाला नाशिक जिल्ह्यात गळती लागली असल्याचे चित्र दिसत आहे नुकतेच येवला येथील शिंदे गटाचे नगरसेवक व उपजिल्हाप्रमुख यांनी समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आणि त्यानंतर आता भुजबळ यांच्यातर्फे मनमाड बाजार समितीच्या माध्यमातून हा दुसरा धक्का दिला आहे यामुळे आता शिंदे गटाला नाशिक जिल्ह्यात गळती लागायला सुरुवात तर झाली नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























