मनमाड-जळगाव चौथ्या रेल्वे लाईन भूसंपादनाला नागापूरच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; ‘८० मीटर’ संपादनाविरोधात आत्मदहनाचा इशारा ! मोजणी प्रक्रिया रखडली
मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड-जळगाव चौथ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी मौजे नागापूर (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील जमिनीच्या भूसंपादनाला स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी आणि सरपंचांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर, येवला उपविभागाचे उपविभागीय अधिकारी (SDO) बाळासाहेब गाढवे यांनी भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या उपमुख्य अभियंत्यांना (निर्माण) सविस्तर पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक विचारात घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी २५ जून २०२६ रोजी मनमाड-जळगाव ४ थ्या रेल्वे लाईनसाठी मौजे नागापूर येथे पोलीस बंदोबस्तात संयुक्त मोजणीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, जमिनीची मालकी गमावण्याच्या भीतीने ग्रासलेल्या बाधित शेतकऱ्यांनी या मोजणीला घटनास्थळी प्रचंड विरोध दर्शवला. शेतकऱ्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाला मोजणीचे कामकाज पूर्ण करता आले नाही.
या संवेदनशील परिस्थितीनंतर, ८ जुलै २०२६ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला येथे संबंधित शासकीय यंत्रणा आणि बाधित शेतकरी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नागापूर येथील सरपंच आणि बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या गंभीर समस्या व मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यात प्रामुख्याने मनमाड-जळगाव फक्त चौथ्या रेल्वे लाईनसाठी नागापूर शिवारातील तब्बल ८० मीटर क्षेत्राचे भूसंपादन केले जात आहे, जे अत्यंत जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करू नये. भूसंपादित होणाऱ्या बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारसांना रेल्वेमध्ये शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे. ८० मीटर रुंदीच्या भूसंपादनामुळे नागापूर येथील अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण शेतजमीन संपादित होत असून, ते पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत. यामुळे या शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर थेट उपासमारीची वेळ येणार आहे. यापूर्वीच या भागात तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी देखील मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली आहे, ज्यामुळे येथील शेतकरी आधीच संकटात आहेत अशा आहेत या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेत, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब गाढवे यांनी मौजे नागापूर येथील शेतकरी राजूबाई भास्कर पवार, बाबासाहेब रामचंद्र उगले, कांतीलाल निवृत्ती खताळ व इतर ग्रामस्थांच्या तक्रारी व मूळ हरकतींचे अर्ज भुसावळ रेल्वे प्रशासनाकडे पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवले आहेत.रेल्वे प्रशासन आता शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर काय आणि कसा निर्णय घेते, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

”मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी करणार आत्महत्या!”शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि न्याय्य मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बाधित शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत.याशिवाय आमच्या जागेवर एकही अधिकाऱ्यांला पाय ठेऊ देणार नाही विशेष म्हणजे राज्य सरकार असो वा केंद्र सरकार आमच्या मर्जीशिवाय आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करू नये असाही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























