मनमाडमध्ये राजकीय सूडबुद्धीचा ‘गांजा पॅटर्न’ उघड; पोलीस निरीक्षक विजय करेंच्या धाडसी तपासाने ‘किंगमेकर’ नेत्यांचे धाबे दणाणले

मनमाड (प्रतिनिधी):राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अमली पदार्थांचा आधार घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा मनमाडमधील ‘गांजा पॅटर्न’ अखेर पोलीस तपासात उघड झाला आहे. भारत नगर येथील बाळू भोसले यांच्या घरात गांजा ठेवून त्यांना फसवण्याचा कट मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी उधळून लावला असून, याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. या तपासात शहरातील बड्या राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भारत नगर भागातील बाळू भोसले यांच्या घराच्या परिसरात पोलिसांना गांजा मिळून आला होता. प्राथमिक माहितीनुसार, भोसले यांच्यावर गांजा विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस निरीक्षक विजय करे यांना या प्रकरणाची व्याप्ती आणि त्यामागील संशयास्पद हालचालींची कुणकुण लागली. त्यांनी या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केला असता, हा सर्व प्रकार भोसले यांना राजकीय सूडबुद्धीने अडकवण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले.
दोन आरोपींना अटक, ‘किंगमेकर’च्या नावाचा उलगडा
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी विकास पोपट शिंदे आणि गोगा सांगळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी भोसले यांच्या घरात गांजा ठेवल्याची कबुली दिली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली असून, या काळात झालेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या कटामागे शहरातील स्वतःला ‘किंगमेकर’ म्हणवणारे एक बडे राजकीय नेते, त्यांचा नगरसेवक पुत्र आणि एका ‘झेरॉक्स’ नगरसेवकाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
‘गांजा पॅटर्न’चा इतिहास आणि विजय करेंचे धाडस
मनमाडमध्ये राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी त्यांना गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनाही अशाच प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते, याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. मात्र, पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या गुन्ह्याचा छडा लावला आहे. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे सामान्य जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
आता लक्ष पुढील कारवाईकडे
सध्या या प्रकरणात मुख्य सूत्रधारांची नावे समोर आली असली तरी, अद्याप बड्या नेत्यांवर प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. मात्र, विजय करे यांची कार्यशैली पाहता, ते कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडणार नाहीत, असा विश्वास नागरिकांना आहे. सत्ताधारी गटाचा हा ‘गांजा पॅटर्न’ आता कायमचा संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आता पोलीस प्रशासन या ‘राजकीय गेंड्यांवर’ कधी आणि काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























