मनमाडमध्ये खळबळ: हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू; वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी
मनमाड(प्रतिनिधी) :येथील येवला रोडवर असलेल्या ‘साई ॲक्वा’ हॉटेलमध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोक व्यक्त केला जात असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ज्ञानेश्वर गायकवाड हा 30 वर्षीय तरुण मित्रासोबत साई ॲक्वा हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. तिथे उपस्थित असलेल्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी नेणे आवश्यक होते.तरुणाला वाचवण्यासाठी उपस्थितांनी त्याला सर्वात जवळ असलेल्या करुणा हॉस्पिटलकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, येवला रोडवर भीषण वाहतूक कोंडी असल्याने रुग्णवाहिका किंवा वाहन पुढे जाणे अशक्य झाले. वेळ वाया जाऊ नये म्हणून सोबत असलेल्या तरुणांनी माणुसकी दाखवत जखमी तरुणाला स्वतःच्या खांद्यावर उचलून हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे तरुणाला रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित या तरुणाचे प्राण वाचले असते, अशी भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या मृत्यूला प्रशासकीय दुर्लक्ष आणि वाहतूक कोंडी जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.या घटनेमुळे मनमाडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका तरुण प्राणाला यामुळे मुकावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































