मनमाडमध्ये अतिक्रमण मोहिमेमुळे टपरीधारक संकटात; पर्यायी जागा देण्याची नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
मनमाड(प्रतिनिधी) : – मनमाड शहरात नगरपरिषदेच्या वतीने सध्या अतिक्रमण विरोधी मोहीम वेगाने राबवली जात आहे. मात्र, या मोहिमेमुळे शहरातील अनेक गरीब, मजूर आणि सुशिक्षित बेरोजगार टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित टपरीधारकांना नगरपालिकेच्या मोकळ्या जागेत पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक राकेश विनोद ललवाणी यांनी मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नगरसेवक राकेश ललवाणी यांनी म्हटले आहे की, मनमाड शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमध्ये ज्यांच्या टपऱ्या हटवण्यात आल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने गोरगरीब, हातमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांचा समावेश आहे. या सर्वांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ या टपऱ्यांवरच अवलंबून होता. अचानक झालेल्या या कारवाईमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या पावसाळा सुरू होत असल्याने या अत्यंत कठीण परिस्थितीत या टपरीधारकांना उघड्यावर कुठेही कामधंदा किंवा व्यवसाय करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.टपरीधारकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत नगरसेवकांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत नगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत या टपरीधारकांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा मिळण्यात यावी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून या गरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. पर्यायी जागा दिल्यानंतर त्या जागेचे नगरपालिकेच्या नियमानुसार जे काही अधिकृत भाडे असेल, ते टपरीधारकांकडून स्वीकारण्यात यावे.बाधित टपरीधारकांचा पाठिंबा या निवेदनावर नगरसेवक राकेश विनोद ललवाणी यांच्यासह शहरातील बाधित टपरीधारकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये नगरसेवक समाजसेवक सादिक युनूस तांबोळी, अमजद रशीद पठाण, सौ. कमल विजय सांगळे, आसिफ कासम शेख (पटेल), मुश्ताक फकीर मोहम्मद कुरेशी आणि पठाण सादिक रशीद यांचा समावेश असून, त्यांनी प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख


































