नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’; ७ जुलैला शाळांना सुट्टी, धबधबे व पर्यटन स्थळांवर बंदी

नाशिक(प्रतिनिधी) :- भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई तर्फे नाशिक जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती, अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, पूरस्थिती आणि भूस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी ६ जुलै २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आणि कडक आदेश जारी केला आहे. हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे.
या सरकारी आदेशातील प्रमुख मार्गदर्शक सूचना आणि निर्णय खालीलप्रमाणे आहेत:
१. शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असलेल्या तालुक्यांमध्ये दिनांक ०७ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
प्रभावित तालुके: त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, सुरगाणा आणि नाशिक ग्रामीण.
व्याप्ती: या तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, तसेच खासगी शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी असेल.
शिक्षकांसाठी सूचना: शाळांना सुट्टी असली तरी मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजासाठी सज्ज राहणे अनिवार्य आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्र: महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार नाशिक महानगरपालिका स्वतंत्रपणे घेईल.
२. पर्यटन स्थळे, धबधबे आणि ट्रेकिंगवर पूर्ण बंदी
पावसाचा जोर आणि संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर नागरिकांच्या प्रवेशाला पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर, वणी (सप्तशृंगी) तसेच जिल्ह्यातील सर्व धबधबे, धबधबा परिसर, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ, पूरप्रवण धार्मिक स्थळे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या ठिकाणी बॅरिकेडिंग करून चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश महसूल, पोलीस आणि वन विभागाला देण्यात आले आहेत.
३. सार्वजनिक कार्यक्रमांवर स्थगिती
जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गर्दी होणारे सर्व कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत.
४. नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
अत्यंत आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
नदी, नाले, ओढे, धरणे, तलाव, पूल, डोंगर उतार आणि भूस्खलन संभाव्य भागात जाणे पूर्णपणे टाळावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे.
५. प्रशासकीय यंत्रणा २४ तास सतर्क
स्थलांतर: पूरप्रवण व भूस्खलन प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे १००% सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, निवारा केंद्रांमध्ये अन्न, पाणी आणि औषधांची सोय करण्याचे आदेश दिले आहेत.
नियंत्रण कक्ष: सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालय न सोडण्याचे आणि २४×७ नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच SDRF, NDRF, अग्निशमन दल आणि आपदा मित्रांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
गर्भवती महिलांची काळजी: पूरप्रवण भागातील उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांची ओळख पटवून त्यांना आगाऊ सुरक्षित आरोग्य संस्थेत दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी.
इतर सेवा: महावितरण कंपनीला वीजपुरवठा सुरक्षित ठेवण्याचे आणि दूरसंचार कंपन्यांना अखंडित मोबाईल व इंटरनेट सेवेसाठी बॅकअप यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
कायदेशीर कारवाईचा इशारा:
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० आणि इतर लागू कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख




























