मनमाड (अजहर शेख) : – “स्वतःचे घर तोडून दुसऱ्याचे शौचालय बांधण्यासारखा हा प्रकार आहे. आम्हाला भूमिहीन करून इतरांना रोजगार देण्याचा घाट प्रशासन घालत असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही,” अशा संतप्त भावना व्यक्त करत मनमाड नजीकच्या अनकवाडे आणि सटाणा येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज प्रशासनांविरुद्ध एल्गार पुकारला. ७/१२ उताऱ्यावरील एमआयडीसीचा (MIDC) बेकायदेशीर शिक्का तात्काळ हटवावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी येवला येथे धरणे आंदोलन केले.मात्र प्रांत अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांनी शोले स्टाईल आंदोलन करत पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले मागण्या मान्य न झाल्यास ‘सामूहिक आत्मदहन’ करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.आमदार सुहास कांदे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असला तरी तो आमच्या लेकराबाळाच भविष्य उध्वस्त करणारा असेल तर आमचा त्याला कडाडून विरोध आहे आणि जीव गेला तरी आम्ही आमच्या जमिनी हस्तांतरण होऊ देणार नाही अशी ठोस भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड नजीक असलेल्या मौजे अनकवाडे आणि मौजे सटाणा येथील शेतजमिनींवर प्रशासनाकडून एमआयडीसीचा शेरा मारण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कोणतेही व्यवहार करता येत नाहीत किंवा कर्ज काढताना अडचणी येत आहेत. हा शेरा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लावण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.विशेष म्हनजे आशा अनेक नोंदी आहेत ज्या वर्षानुवर्षे पासुन प्रलंबित आहेत मात्र महसूल विभागाने त्या अद्यापही लावल्या नाहीत मात्र आमची इच्छा नसतांना आणि आम्हाला कोणत्याही पूर्वसूचना न देता आमच्या सात बारा उताऱ्यावर त्यांनी इतर हक्कमध्ये MIDC ची नोंद टाकण्यात आली आहे. या घटनेचा आम्ही निषेध केला असुन भविष्यात आमची इच्छा नसताना आमची एक इंचही जागा घेऊ देणार नाही वेळ पडली तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रांत अधिकारी उपलब्ध नसल्याने संतप्त शेतकरी बांधवांनी शोले स्टाईल आंदोलन करत पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलन केले व भविष्यात जर आमच्या शेतीतील एक इंच जागाही घेतली तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला.लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार पी आर निळे,अनिल गुंदेचा, निलेश चुणूके,शौकत शेख,प्रशांत कातकडे,कल्याण माकूने,शामराव शिंदे ,जयवंत जाधव यांच्यासह शंभर पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत यात शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेला एमआयडीसीचा शेरा तात्काळ रद्द करण्यात यावा व ज्या अधिकाऱ्यांनी अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने हे शिक्के मारले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. आंदोलनस्थळी बोलताना शेतकरी नेत्यांनी गंभीर आरोप केला की, संबंधित महसूल आणि एमआयडीसीचे अधिकारी हे ठराविक राजकीय नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचा हा डाव असून, लोकशाही मार्गाने दिलेला हा लढा आता तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रशासनाला शेवटचा इशारा
“आम्ही आमची जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. जर प्रशासनाने आमच्या ७/१२ वरील नोंदी तातडीने दुरुस्त केल्या नाहीत, तर आम्हाला टोकाचे पाऊल उचलावे लागेल. सर्व शेतकरी मिळून सामूहिक आत्मदहन करू, ज्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल,” असा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे.
या आंदोलनात अनकवाडे आणि सटाणा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आता यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख































