मनमाड-इंदूर महामार्गावर पुलाची तुटलेली संरक्षण जाळी ठरतेय अपघाताला आमंत्रण; हायवे ऑथॉरिटीने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
मनमाड(प्रतिनिधी):- मनमाड-इंदूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक मोठी दुर्घटना टळली असली, तरी आता या ठिकाणी अपघाताचा नवा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी महामार्गावरील पुलावरून जात असताना एका ट्रक चालकाला अचानक फिट (मिरगी) आल्याने तो बेशुद्ध झाला होता. यामुळे नियंत्रण सुटलेला ट्रक पुलावरून खाली कोसळण्याच्या बेतात होता, मात्र सुदैवाने तो पुलाच्या लोखंडी संरक्षण जाळीला (रेलिंग) अडकला. या विचित्र अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र लटकलेल्या पाईपमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड शहरात दोन दिवसांपूर्वी एक ट्रक पुलावरून खाली कोसळला मात्र हा ट्रक अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या धडकेमुळे पुलाची मजबूत लोखंडी संरक्षण जाळी पूर्णपणे तुटली आहे. या जाळीचे जड लोखंडी पाईप थेट खालील रस्त्यावर हवेत लटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे लटकलेले पाईप खालील रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि इतर वाहनचालकांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहेत. बाजूने जाताना एखादा पाईप वाहनावर कोसळल्यास किंवा त्याला धडकल्यास मोठा अपघात होऊन प्रवाशांचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा युवक सचिव चंद्रमणी उबाळे यांनी तात्काळ कारवाईचे मागणी केली असुन अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

रिपाइंकडून तातडीने दुरुस्तीची मागणी
या पुलाखालून आणि बाजूने दररोज शेकडो वाहनांची मोठी वर्दळ असते. हा गंभीर धोका लक्षात घेता, नॅशनल हायवे ऑथॉरिटीने (NHAI) याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. हे लटकलेले पाईप तात्काळ काढून त्या ठिकाणी नवीन मजबूत संरक्षण जाळी बसवावी, अशी आक्रमक मागणी आता सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांकडून तसेच रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केली जात आहे. प्रशासनाने एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता त्वरित उपाययोजना करावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
चंद्रमणी उबाळे जिल्हा सचिव युवक आघाडी रिपाई


✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख
























