मनमाडला पालिकेची ‘एक डोळा काजळ, एक डोळा माळ’ भूमिका? गोरगरिबांची अतिक्रमणे भुईसपाट, मात्र बड्या व्यापाऱ्यांच्या बेशिस्त पार्किंगकडे कानाडोळा!
मनमाड (विशेष प्रतिनिधी) :शहरात सध्या पालिका प्रशासन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या धडाक्यात राबवली जात आहे. गेल्या काही दिवसांत शेकडो अतिक्रमणे हटवून प्रशासनाने रस्ते मोकळे केल्याचा दावा केला असला तरी, या कारवाईच्या पद्धतीवरून आता सामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेने केवळ हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब छोट्या व्यवसायिकांची आणि टपऱ्यांची अतिक्रमणे हटवली, मात्र शहरातील मुख्य बाजारपेठेतील धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला अभय दिले जात आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. परिसरात असलेल्या अनेक मोठ्या दुकानांसमोर दिवसभर दुचाकी आणि चारचाकी वाहने अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. ग्राहकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या या गाड्या थेट रस्त्यांपर्यंत पार्क केल्या जात असल्याने आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवरून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहत असतानाही पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोघांचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे.
धनदांडग्यांवर मेहेरनजरेचा आरोप
“गरीब माणसाने रस्त्याच्या कडेला छोटी टपरी लावली की ती वाहतुकीला अडथळा ठरते म्हणून लगेच जेसीबी आणून तोडली जाते,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, शहरातील बड्या दुकानांसमोर लागणाऱ्या गाड्यांच्या रांगांमुळे दररोज मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असतानाही, प्रशासन या धनदांडग्या व्यापाऱ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा गाड्या जप्त करण्याची मोहीम का राबवत नाही? बड्या असामींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालिका प्रशासन विशेष काळजी घेत आहे का, अशी शंका आता सर्वसामान्य जनतेतून उघडपणे उपस्थित केली जात आहे.

पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अतिक्रमण मोहिमेत दाखवले जाणारे शौर्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग हटवताना कुठे गायब होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बाजारपेठेत होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. या दुटप्पी भूमिकेमुळे मनमाड नगर पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने खरोखरच शहराचा विकास आणि रस्ते मोकळे करायचे असतील, तर केवळ गरिबांवर कारवाई न करता भेदभाव बाजूला ठेवून बाजारपेठेतील बेशिस्त पार्किंग करणाऱ्या बड्या दुकानांवर आणि वाहनधारकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता मनमाडच्या सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे.मनमाडला पालिकेची ‘एक डोळा काजळ, एक डोळा माळ’ भूमिका? गोरगरिबांची अतिक्रमणे भुईसपाट, मात्र बड्या व्यापाऱ्यांच्या बेशिस्त पार्किंगकडे कानाडोळा!

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































