हमाली करणाऱ्या बापाच्या कष्टाला ‘खाकी’ची सलामी; जिद्दीच्या जोरावर राजेश्वरी जाधवची पोलीस दलात निवड
मनमाड(आवेश कुरेशी):- ‘इच्छाशक्ती प्रबळ असेल तर गरिबी कधीच यशाच्या आड येत नाही’, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील राजेश्वरी विजय जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. हमालीचे काम करणाऱ्या वडिलांच्या घामाचे चीज करत राजेश्वरीने पोलीस भरतीत यश संपादन केले असून, तिच्या या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.माझ्या वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिकवले आहे आणि त्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे म्हणून मी खुप कष्ट केले व माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असे मत राजेश्वरीने व्यक्त केले.
राजेश्वरीचे वडील विजय जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा भार वाहत असताना त्यांनी मुलीच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही. हमालीतून मिळणारा कष्टाचा पैसा त्यांनी मुलीच्या स्वप्नांसाठी खर्च केला. वडिलांचे हे अपार कष्ट राजेश्वरी जवळून पाहत होती आणि याच कष्टाचे चीज करण्यासाठी तिने ‘खाकी’ वर्दी मिळवण्याचा निश्चय केला होता.राजेश्वरीने आपल्या ध्येयप्राप्तीसाठ अकॅडमी’मध्ये प्रवेश घेतला. अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली तिने मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी दिवस-रात्र एक केली. अभावाच्या परिस्थितीतही जिद्द न हरता तिने घेतलेल्या मेहनतीमुळे अखेर तिची पोलीस दलात निवड झाली आहे.

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षावएका हमाल बापाच्या मुलीने पोलीस वर्दीला गवसणी घातल्याने समाजातील सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. “मुलीने माझ्या कष्टाचे सोने केले,” अशी भावना व्यक्त करताना विजय जाधव यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते. राजेश्वरीचे हे यश ग्रामीण भागातील आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























