मनमाड(प्रतिनिधी):मनमाड नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील सुमारे ६०० गोरगरीब, हातमजूर आणि छोट्या व्यवसायिकांवर करण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम तात्काळ थांबवावी, अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते आणि कायद्याचे अभ्यासक रवींद्र चंद्रकांत निकम यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी आमदार सुहास कांदे, मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनमाड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन दिले आहे.
”प्रशासनाने गालात मारली तरी चालेल, पण पोटावर मारू नका!”
दिलेल्या निवेदनात रवींद्र निकम यांनी म्हटले आहे की, कोरोना काळानंतर देशातील आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली होती. मनमाडमध्ये कोणतीही मोठी एमआयडीसी किंवा रोजगाराची साधने उपलब्ध नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत अनेक गोरगरीब नागरिक, कष्टकरी आणि हातमजूर रस्त्याच्या कडेला छोटी-मोठी टपरी, हातगाडा किंवा स्टॉल लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. आता कुठे त्यांचे व्यवसाय थोडेफार रुळावर येत असताना, प्रशासन पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे हटवून ६०० कुटुंबांना रस्त्यावर आणण्याचे काम करत आहे.
”प्रशासनाने अतिक्रमण धारकांच्या गालात मारली तर चालेल, पण त्यांच्या पोटावर मारू नका,” अशी भावनिक साद निकम यांनी प्रशासनाला घातली आहे.
लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांवर नाराजी
नगरपालिकेने यापूर्वीच जनरल मिटिंगमध्ये अतिक्रमण काढण्यासंबंधीचा ठराव मंजूर केला असून, कोणती अतिक्रमणे काढायची याचे व्हिडिओ शूटिंगही पूर्ण केले आहे. यावर तीव्र आक्षेप घेत निकम यांनी म्हटले आहे की, ज्या गोरगरीब जनतेने मतदान करून नगरसेवकांना निवडून दिले, तेच नगरसेवक आज या कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देणारा ठराव मंजूर करत आहेत, हा सर्रास अन्याय आहे. त्यांनी सर्व नगरसेवकांना असे ठराव न घेण्याची विनंती केली आहे, जेणेकरून कष्टकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही.
आमदार सुहास कांदे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती
मनमाडकरांच्या वतीने रवींद्र निकम यांनी स्थानिक आमदार सुहास (अण्णा) कांदे यांना साकडे घातले आहे. “कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांनी या विषयात तात्काळ हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांना ही कारवाई थांबवण्याचे आदेश द्यावेत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
’प्रशासन जबाबदार राहील’ चा इशारा
६०० छोट्या व्यापाऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतल्यास त्यांच्या संपूर्ण परिवारावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे ही नोटीस आणि कारवाई तूर्तास स्थगित करावी. जर प्रशासनाने ही कारवाई बळजबरीने पुढे रेटली, तर गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आपण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसू. या आंदोलनादरम्यान आपल्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा थेट इशारा रवींद्र चंद्रकांत निकम यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































