मनमाडकरांच्या नशिबी ‘अळीयुक्त’ पाणीच! पालिका प्रशासनासह विरोधकांचाही नाकर्तेपणा समोर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मनमाड(अजहर शेख) :गेल्या पाच दशकांपासून भीषण पाणीटंचाई सोसणाऱ्या मनमाड शहरात आता आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मनमाड नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा केवळ अनियमितच नाही, तर अत्यंत दूषित आणि अळ्यांनी माखलेला असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले असतानाच, या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्यात अपयशी ठरलेल्या विरोधी पक्षांचा आणि नेत्यांचा नाकर्तेपणाही आता चव्हाट्यावर आला आहे.शहरातील कॅम्प भागात आज पाणी सोडण्यात आले यात असंख्य अशा जिवंत अळ्या आल्या आहेत याआधीही गटारीचे पाणी आणि चिखल नळातून आला होता याबाबत झेरॉक्स लोकप्रतिनिधीकडे तक्रारी केल्या मात्र तेही सत्ताधारी गटासमोर बोलण्यसाठी तयार नाहीत
नळाला येतेय ‘अळ्यांचे’ पाणी

मनमाडमध्ये सध्या आठवड्यात दोनदा पाणीपुरवठा होत आहे. मात्र मिळणारे पाणीही पिण्यायोग्य नसल्याने महिलांमध्ये प्रचंड संताप आहे. शहरातील विविध भागांत नळाला येणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या आणि कचरा आढळत असल्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. वाघदर्डी धरणातील साठवलेल्या ‘डेड स्टॉक’मधून गाळयुक्त पाणी उपसले जात असल्याने ते शुद्ध न होताच थेट नळाला येत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे शहरात पोटाचे विकार आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.
विरोधक आणि नेत्यांचा केवळ ‘बोगस’ कळवळा?
या गंभीर मुद्द्यावर सत्ताधारी गटासोबतच विरोधकांची भूमिकाही संशयास्पद ठरत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना विरोधी पक्षाचे नेते केवळ कागदी पत्रव्यवहार आणि सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरते मर्यादित राहिल्याची भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याऐवजी किंवा प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याऐवजी विरोधक केवळ ‘सूर’ मिळवण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक नेत्यांच्या या उदासीनतेमुळे मनमाडकर स्वतःला पोरके समजत आहेत.
३५० कोटींच्या योजनेचे भिजत घोंगडे
शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राज्य सरकारने करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी ३५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, या योजनेचे काम कासवगतीने सुरू असून, वारंवार मुदतवाढ देऊनही ती पूर्ण झालेली नाही. प्रशासनावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे फावत असून, याचा फटका मात्र सामान्य जनतेला बसत आहे.
नागरिकांची मागणी: ‘आम्हाला जिवंत अळ्यांचे पाणी नको!’
“आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, पण त्याबदल्यात आम्हाला विषारी आणि अशुद्ध पाणी दिले जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आमच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही का?” असा सवाल शहरातील गृहिणी विचारत आहेत. तात्काळ जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
झेरॉक्स नगरसेवकाकडून नागरीकांची बोळवण..
कॅम्प भागातील नगरसेवक या महिला आहेत त्यामुळे साहजिकच त्यांच्या बदल्यात त्यांचे पती काम बघतात त्यामुळे या झेरॉक्स नगरसेवकांना फोन करून विचारणा करण्यात आली तर यावेळी पाईपलाईनचे काम झाले आहे पुढच्या वेळी तुम्हांला चांगले पाणी येईल आणि सुरवातीला आलेलं पाणी वाया जाऊ द्या व नंतर चांगले पाणी भरा अशी बोळवण या झेरॉक्स नगरसेवकांनी केली आहे

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख

































