मनमाड महाविद्यालयात लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मनमाड(आवेश कुरेशी) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती संस्थेचे आधारवड लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांची ९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रा विठ्ठल सातपुते यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांचा कार्याचा परिचय व हिरे घराण्याच्या उत्तुंग इतिहासाचा मागोवा घेताना सांगितले की, लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांनी ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात शाळा सुरू केल्या व परिसराचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.जिल्ह्यातील धरण, पाझर तलाव, तळी निर्माण करून पाणीपुरवठा योजना राबवून, गावा गावातील पाणी समस्या कायमची सोडविली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकताना सांगितले की, राजकारण, शिक्षण व सहकार या तिन्ही क्षेत्रात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्याप्रमाणेच लोकनेत्यांनी या तिन्ही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. लोकनेत्यांना सत्तेचे केंद्रीकरण पसंत नव्हते. त्यांची लोकशाहीवर निष्ठा होती. लोकशाहीच्या मूल्यांसाठी लढणे हाच त्यांचा ध्यास होता, इत्यादी विचार त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा. देवेंद्र पवार यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी एस देसले, व्यावसायिक शिक्षण विभागाचे उपप्राचार्य प्रा पी के बच्छाव, कुलसचिव श्री समाधान केदारे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. व्ही. आर. फंड,यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. शरद वाघ प्रा अमोल दिसले, व प्रा. पी.व्ही.अहिरे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























