नांदगाव तहसील कार्यालयासमोर वनजमीन धारक व शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन; हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार
नांदगाव(महेश पेवाल) :तालुक्यातील वनजमीन धारक आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षाच्या निषेधार्थ आजपासून नांदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे.आंदोलनाची सुरुवात शहरातील ऐतिहासिक हुतात्मा चौकातून करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी आणि वनजमीन धारकांनी राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन मिळालीच पाहिजे”, “प्रशासकीय दिरंगाईचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. हुतात्मा चौकातून रॅली काढून आंदोलक तहसील कार्यालयावर धडकले व तेथेच ठिय्या मांडून बसले.
अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा व माकपच्या वतीने १६ ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत आमदार कॉ. जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक पायी लाँग मार्च काढण्यात आला होता. या लाँग मार्चची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनजमीन धारकांच्या प्रलंबित मागण्या आणि दावे निकाली काढण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल दहा वर्षे उलटून गेल्यानंतरही नांदगाव तालुक्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.या आंदोलनात नांदगाव तालुक्यातील शेकडो वनजमीन धारक, शेतकरी, कष्टकरी आणि किसान सभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसील कार्यालयासमोरून न हलण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर रोष
आंदोलकांचे नेतृत्व करणारे किसान सभेचे कॉ. विजय दराडे यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “लाँग मार्चनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही नांदगाव तालुक्यातील फॉरेस्ट अधिकारी (वन विभाग) आणि तहसीलदार यांच्याकडून या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई किंवा अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे हक्काच्या जमिनीपासून शेतकरी वंचित राहिले असून, त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा कॉ. दराडे यांनी दिला.

✍🏻मुख्य संपादक – अमीन नवाब शेख






























